नाशिकच्या “या” भागात रात्रीची घंटागाडी आता नियमित सुरू राहणार
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून खंडीत झालेली रात्रीच्या घंटागाडीची सेवा आता प्रभाग क्रमांक २४ मध्ये पुन्हा नियमित सुरू राहणार आहे. सकाळी लवकर घराबाहेर पडणार्या व संध्याकाळी परतणार्या रहिवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २४ मध्ये दि. २१ एप्रिल २०२२ पासून रात्रीची घंटागाडी सुरू करण्यात आली होती. गोविंदनगर, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगर भागात दोन घंटागाड्या घरोघरी रात्री कचरा संकलीत करीत होत्या.
शहरातील या पहिल्याच प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, अधुनमधून घंटागाड्या येत नसल्याने ही सेवा विखंडीत स्थितीत सुरू होती. महापालिकेने नवीन ठेकेदारामार्फत १ डिसेंबरपासून घंटागाडी चालविण्यास सुरुवात केली आहे.
आता तरी अखंडपणे या प्रभागात ही सेवा नियमित सुरू करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी नागरिकांच्या वतीने महापालिकेला दिला होता. याबाबत १ डिसेंबर २०२२ रोजी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी घेतली. सोमवार, दि. ५ डिसेंबरपासून रात्रीची नियमित घंटागाडी सुरू केली.
या नव्या घंटागाडीचे पूजन करून रहिवाशांनी नियमित सेवेचे स्वागत केले. यामुळे गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर या भागातील रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
चारुशीला गायकवाड (देशमुख), बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, सखाराम देवरे, आर. आर. जाधव, गोविंदनगर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, नवे नाशिक ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, श्रीकांत नाईक, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, सुनीता उबाळे, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, सुजाता काळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील यांच्यासह नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.