नाशिक: खासदार संजय राऊत यांना दिलासा; जिल्हा न्यायालयाचा अंतरिम जामीन मंजूर
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खा. राऊत यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर २३ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा दिला.
मुंबई नाका पोलिस ठाण्यातील हवालदार ललित केदारे (रा. बनकर मळा, पुणा रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १२) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांनी, शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करताना, हे सरकार तीन महिन्यांत जाणार. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारने जे आदेश काढले ते सर्व बेकायदेशीर आहे.
प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे, की बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. ते तीन महिन्यांत जाईल. बेकायदा आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. न्यायालयाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असे म्हणाले होते.
खासदार राऊत यांच्या या वक्तव्यामुळे पोलिसांविषयी समाजात अप्रीतीची भावना निर्माण होईल. तसेच, सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे याप्रकरणी खासदार राऊत यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत पोलिस अप्रीतीची भावना चेतवणे अधिनियम १९२२ चे कलम ३(१) सह भादंवि ५०५ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी, खा. राऊत यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी (ता. १६) न्या. राठी यांच्यासमोर सुनावणी झाली.
या वेळी खा. राऊत यांच्यावतीने ॲड. एम. वाय. काळे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार, न्यायालयाने खा. राऊत यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खा. राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.