औषधांचा अवास्तव वापर टाळून शासनाच्या व तज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे वापरासाठी पथकांमार्फत ठेवणार नियंत्रण
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये सध्या कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे रुग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची व रेमडेसिव्हिरची ही मागणी त्याप्रमाणात वाढत आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाच्या मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरचा वापर करावा जेणेकरून सदर औषधांचा अवास्तव वापर टाळता येईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना हे वेळेवर उपलब्ध होवून त्यांना फायदा होईल,त्यासाठी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. ही पथके आजपासूनच कार्यरत करण्यात आली आहेत.
आज जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिव्हिर बाबत जिल्ह्यातील पथक प्रमुख प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. या बैठकीस नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मालेगाव महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, प्रशांत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, जिल्हा उद्योग केंद्र, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, सद्यस्थितीमध्ये संपूर्ण राज्यभर ही कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यस्तरावरून होणारा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकारणास्तव जिल्ह्यातील सर्व रूग्णालयातील ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरबेड, आयसीयू बेड इत्यादी बाबत माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर रुग्णालयांमध्ये त्याप्रमाणे व्यवस्था अस्तित्वात आहे किंवा नाही याची खात्री करण्यात यावी, सदर रुग्णालयांना पुरवठा होणारा ऑक्सिजन तज्ञांचे मार्गदर्शन सूचनांनुसार योग्य रीतीने वापरला जात आहे किंवा नाही व संबंधित रुग्णालयांची वितरण व्यवस्था, साठवणूक क्षमता इत्यादी बाबतीत नियंत्रण आणि तपासणी करण्यात यावी.
तसेच रेमडेसिव्हिरच्या बाबतीत सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून त्या अनुषंगाने काही रुग्णालये सरळ रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सदरचे रेमडेसिव्हिर विकत घेऊन आणण्याबाबत लिहून देत आहेत. जिल्ह्यात सदर औषधाची टंचाई अथवा काळाबाजार या बाबतीतकाही तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर औषधाचे वाटपाकरिता मध्यवर्ती कक्ष स्थापन केलेला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात दररोज प्राप्त रेमडेसिव्हिर साठा, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या व ज्यांना सदर औषध आवश्यक आहे अशा रुग्णालयांचे मागणीप्रमाणे प्राप्त साठा विचारात घेवून दैनंदिन वाटप नियंत्रण केले जात आहे. सदर साठा रुग्णालयात प्राप्त झाल्यानंतर तो साठा संबंधित ज्या रुग्णांकरिता मागणी केला आहे त्याच रुग्णांना दिला आहे किंवा कसे, याची खात्री करण्यासाठी तपासणी पथके नेमून कार्यवाही करणार आहेत, असेही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी सर्व जनता, वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णांना आवाहन केले आहे की, कोविड रुग्णांचे बाबतीत ऑक्सिजनव रेमडेसिव्हिरचा सरसकट सर्व रुग्णांनी वापर करणे योग्य नाही, याचे वापराबाबत शासन, या क्षेत्रातील तज्ञ आणि इंडियन मेडिकलअसोशिएशन यांचे द्वारे निर्गमित मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच या बाबींचा वापर करावा जेणेकरून सदर औषधांचा अवास्तव वापर टाळता येईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना हे वेळेवर उपलब्ध होवून त्यांना फायदा होईल.
या अनुषंगाने जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका क्षेत्रांमध्ये संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागांमध्ये संबंधित तालुक्याचे तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांचेमार्फत वेगवेगळी पथके तयार करण्यात येऊन उपरोक्त दोन्ही विषयांच्या अनुषंगाने काटेकोर तपासणी करण्यात येणार असून त्याबाबतयोग्य वापर सुनिश्चित केला जाईल. ज्या ठिकाणी या बाबींचा नियमबाह्यकिंवा गैरवापर करण्यात आल्याचे निदर्शनास येईल त्याठिकाणी सक्त कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.
ही पथके स्थापन करण्याचा प्रमुख उद्देश गरजू रुग्णांपर्यंत औषध व ऑक्सिजन पोहोचवणे हा असल्याचे जिल्हाधिकारी स्पष्ट केले. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाचे तसेच क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकीय व्यावसायिकांचे देखील सहकार्य प्राप्त करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वांचे अथक प्रयत्न आणि सहकार्याने आपला नाशिक जिल्हा याही परिस्थितीवर लवकरच मत करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी व्यक्त केला.