नाशिक। दि. १५ मार्च २०२६: नाशिक शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेत शनिवारी (दि. १४) काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, यापूर्वी ३८.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले कमाल तापमान शनिवारी ३६.१ अंशांपर्यंत खाली आले. मात्र किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीचा उकाडा नागरिकांना जाणवू लागला आहे.
गेल्या दहा वर्षांत प्रथमच १२ मार्च रोजी तापमानाचा पारा ३८.५ अंशांपर्यंत पोहोचला होता, जो या हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. त्यानंतर तापमानात घट होत गेली. शुक्रवारी कमाल तापमान ३७.८ अंशांवर तर शनिवारी ते ३६.१ अंशांपर्यंत खाली आले. दुपारनंतर वारा सुटल्याने उन्हाची झळ काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मात्र उन्हाची तीव्रता जाणवत होती. शनिवारी किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीचा उकाडा वाढत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पशुधनाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून करण्यात आले आहे. उष्णतेपासून बचावासाठी सुरक्षित व थंड वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारी (दि. १५) व सोमवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारपासून कमाल तापमानात आणखी घट होऊ शकते, अशी माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली.
![]()

