नाशिक। दि. २४ मार्च २०२६: शहरात उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून, रविवारीच्या तुलनेत सोमवारी कमाल तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअसने वाढ नोंदविण्यात आली. रविवारी ३३ अंशांवर असलेले तापमान सोमवारी ३६.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक जाणवला. परिणामी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळेत वातावरण तुलनेने आल्हाददायक असले, तरी दुपारनंतर उन्हाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. अत्यावश्यक कामांशिवाय अनेकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र होते.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, रुमाल, स्कार्फ तसेच छत्रीचा वापर करताना दिसले. तापमानातील अचानक वाढीचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच बाहेर काम करणारे मजूर, विक्रेते आणि वाहनचालक यांच्यावर होत आहे.
दरम्यान, दुपारच्या वेळेत बाहेर पडणाऱ्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे शहरात थंड पेये, सरबत, लिंबूपाणी, उसाचा रस, ताक आणि नारळपाणी यांना मोठी मागणी वाढली आहे.
![]()

