नाशिक। दि. ४ एप्रिल २०२६: दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनावरून परतत असताना इर्टिका कार शेतातील विहिरीत कोसळल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील राजे बँक्वेट हॉलमध्ये एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दिंडोरी शहरासह आसपासच्या भागातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे १० वाजता इंदोरे (ता. दिंडोरी) येथील दरगोडे कुटुंबीय इर्टिका कारने घरी निघाले.
मंगल कार्यालयाजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत कार अचानक कोसळली. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू ठेवत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
मृतांची नावे :
सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), रेशमा सुनील दरगोडे (३३), राखी सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, श्रुष्टि अनिल दरगोडे (१६), श्रेयश अनिल दरगोडे (११), माधुरी अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, समृद्धी राजेश दरगोडे (७).
![]()

