नाशिक (प्रतिनिधी): जमिनीच्या मालकी हक्कासाठी हक्कपत्रकात (7/12) नाव दाखल करणे आवश्यक असते. त्यासाठी फेरफार रूजू केला जातो. ही प्रक्रिया संगणकीय पद्धतीने अधिक सुलभ व पारदर्शक होण्यासाठी ई- हक्क प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत 56 हजार 884 अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व खातेधारकांनी ई- हक्क प्रणालीचा लाभ घेवून आपाल्या मिळकतीचे हक्कपत्र अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद, मृताचे नाव कमी करणे, बँक बोजा चढविणे अथवा उतरविणे, इकरार, अज्ञान पालक कर्ता, एकत्र कुटुंब कर्ता नोंद कमी करणे, विश्वस्तांची नावे बदलणे, खातेदारांची माहिती भरणे, हक्कपत्रकातील लेखनप्रमाद चुका दुरूस्त करणे अश प्रकारच्या महत्वाच्या नोंदी हक्क पत्रकात घेण्यासाठी ई- हक्क प्रणालीचा वापर करण्यात येतो.
त्यासाठी खातेदार, बँका तसेच सहकारी सोसायटी यांनी https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून संबंधित ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे तपासणी सूचीप्रमाणे ऑनलाईन कागदपत्र सादर करावीत. यासाठी खातेदार स्वत: अर्ज दाखल करू शकतात किंवा महा ई- सेवा कंद्र, संग्राम केंद्र किंवा सी.एस.सी केंद्रामार्फत अर्ज केल्यास त्यासाठी प्रती अर्ज रू 50 इतके शुल्क निर्धारीत करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790