नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सर्व वयोगटांतील नागरिकांचे डोळे येण्याची साथ वाढल्यामुळे शुक्रवारपासून १५ दिवस नाशिक मनपा हद्दीतील सर्व उद्याने बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली आहे.
गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये लहान मुलांसह अनेक रहिवाशांचे डोळे येण्याची साथ वाढली आहे. त्यात लहान मुले बागेत आल्यानंतर डोळे आलेल्या मुलांच्या खेळण्यामुळे निरोगी मुलांनादेखील प्रत्यक्ष संपर्क आणि खेळण्यांच्या वापरातून संसर्ग वाढू शकतो.
त्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून उद्यापासून 15 दिवस नाशिक मनपा हद्दीतील सर्व १०० उद्यानांत नागरिकांना प्रवेश बंद राहील.
प्रवेशद्वाराला कुलूप लावून तेथील रखवालदारामार्फत सुमारे 15 दिवस उद्याने बंद असल्याची सूचना नागरिकांना देऊन 15 दिवस संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. डोळे येणे हा आजार संसर्गजन्य असल्याने , गरज पडल्यास 15 दिवसांनंतरही उद्यानात प्रवेश बंदची अंमलबजावणी वाढविली जाण्याची शक्यता आहे; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती बघून हा निर्णय घेण्यात येणार आहे.
तूर्त नागरिकांनी आपल्या मुलांसह महापालिकेच्या उद्यानात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.