नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुलै महिन्याच्या सुरुवातीला दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे मुंबई नाका परिसरात सापळा रचून संशयितास पकडण्यात आले असून दोघांकडून सुमारे ५२ हजारांचे १८ मोबाईल जप्त करण्यात आले.
गुन्हे शोध पथकाचे अधिकारी वसंत पवार यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे व पथकातील पोलिस अंमलदार तपास करीत असताना अंबड परिसरात टाकलेल्या धाडीत एका आरोपीस अटक केली होती.
सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी (३२, भारतनगर, वडाळा) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा साथीदार वाजीद जैद शेख (१९, भद्रकाली) हा त्यावेळी पळून गेला होता. त्याचा तपास सुरू असतानाच हवालदार कयूम सैयद यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाजीद यास मुंबई नाका येथील मानवता हॉस्पिटल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तपास सुरू असताना दोघांनीही मोबाईल दुकान फोडल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे नवीन व जुने असे ५२ हजार रुपये किमतीचे एकूण १८ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.