नाशिक : पोलिसांच्या दिरंगाईमुळे गुढीपाडव्याचे कार्यक्रम रद्द !
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक परंपरेला शहर पोलिसांकडून अपशकुन लावला जातो आहे. राज्यात डोंबीवली, दादरसह अन्य ठिकाणांवर परवानग्या मिळत असतांना नाशिकमध्ये पोलिसांकडून अडवणूक होते आहे. ५ मार्चला परवानगी अर्ज सादर केलेला असतांना अद्याप कुठलीही परवानगी दिलेली नाही.
पोलिसांच्या या धोरणामुळे नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आयोजित केलेले महावादन, महाअंतरनाद व महारांगोळी हे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत असल्याचा खेद नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी व्यक्त केले.
शंकराचार्य न्यास संकुल येथे झालेल्या पत्रकार परीषदेत श्री.संचेती यांनी नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांची भुमिका मांडली. पत्रकार परीषदेस नववर्ष स्वागत समितीचे सचिव जयंत गायधनी, राजेश दुरगुडे, शिवाजी बोंदार्डे, नितीन वारे, नितीन पवार, सुमुखी अथनी, निनाद पंचाक्षरी, केतकी चंद्रात्रे, नीलेश देशपांडे, भारती सोनवणे आदी उपस्थित होते. गोदाकाठावरील पाडवा पटांगणावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. नववर्ष स्वागत यात्रेचेही आयोजन समितीमार्फत केले जाणार नाही. मात्र जनता ठरवेल, त्या दिशेने नववर्ष स्वागत यात्रेचा विषय जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिक माहिती देतांना श्री.संचेती म्हणाले, की एक खिडकी योजनेअंतर्गत ५ मार्चला परवानगीसाठी अर्ज केलेला होता. अनेकवेळा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेण्यासाठी तासंतास प्रतीक्षा केली. असे असूनही कधी लेखापरीक्षण अहवाल (ऑडीट रिपोर्ट) तर कधी अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले गेले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही परवानगी दिली जात नसल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला.
राजकीय पुढाऱ्यांमध्ये उदासीनता:
श्री.संचेती म्हणाले, की यासंदर्भात आमदार राहुल ढिकले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्यामार्फतही प्रयत्न करुन पाहिले. तरी परवानगी मिळत नसल्याने अखेर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परवानगी मिळेल, असे आश्वासन दिले. यानंतर पोलिसांकडून पुन्हा सोमवारी (ता.२८) भेटीसाठी बोलविले असून आता यापुढे परवानगीसाठी पोलिस ठाण्यांमध्ये जाणार नसल्याचे श्री.संचेती यांनी स्पष्ट केले.