दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नयेत, साई संस्थानकडून आवाहन
नाशिक (प्रतिनिधी): काल आरबीआयने दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या चार महिन्यांमध्ये नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून मिळणार आहेत. नोट बंद झाल्याने काही लोक दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र साई संस्थानने भाविकांना एक आवाहन केलं आहे.
काल दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर साई संस्थानने दानपेटीत दोन हजारांच्या नोटा न टाकण्याचं भाविकांना आवाहन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत भाविक दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू शकतात. त्यानंतर टाकू नयेत, असं निवेदनात सांगण्यात आलेलं आहे.
दोन हजारांच्या नोटा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असं आरबीआयने जाहीर केलं आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करुन बदलण्याची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठलीही गोंधळाची किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चार महिन्यांचा कालावधी नोटा बदलीसाठी देण्यात आलेला असल्याचं RBI ने स्पष्ट केलं. फक्त एकावेळी २० हजार रुपये बदलता येणार आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा सर्वात मोठी असलेली एक हजाराची नोट बंद करुन दोन हजाराची नोट चलनात आणली होती. आता ही सर्वात मोठी असलेली दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.