आतापर्यंत निभावलं आम्ही…पण पुढे काय? प्रत्येक मध्यमवर्गीयाचा प्रश्न..!

नंदिनी मोरे, नाशिक
जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला हतबल करून सोडले आहे. मोठ्यात मोठ्या महासत्तांनी देखील आपले हात टेकले आहे. मानवी जीवावर उठलेल्या हा कोरोना ‘होत्याचे नव्हते’ करून टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक एक दिवस उलटत गेला तसतसे कोरोनाचे संक्रमण गुणाकार पद्धतीने वाढत गेले आणि संपूर्ण जगातील जनजीवनच विस्कळीत झाले.

कोरोना हा संसर्गजन्य असल्याने सामाजिक अंतर ठेवणे हाच एक उपाय म्हणून संपूर्ण व्यवहार बंद करून सर्व नागरिकांनी घरातच थांबून स्वरक्षणासोबतच देशाचे सुद्धा रक्षण करायचे असे आवाहन सरकार केले. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात हातावर कमवणारी जनता आहे. दिवसभर काम केले तरच रात्रीची भाकर मिळते हे गणित माहित असलेल्यांना काय समजेल लॉकडाऊन? या लॉकडाऊनमुळे तर त्यांचा पोटाची चाळणीच झालीये आता !

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

देशात एकीकडे असा वर्ग आहे ज्यांचे लॉकडाऊन हे उन्हाळी सुट्यांप्रमाणे अगदी मौजमजेत जात आहे. पुढे वर्षभर जरी असेच सुरु राहिले तरीही अगदी आरामात त्यांची गुजराण होईल आणि दुसरीकडे अतिशय दयनीय अवस्था असलेला वर्ग ज्यांची पोटापाण्याची व्यवस्था गल्लीतील पुढारी लोकांपासून ते शासन सर्वच करताय; पण, या दोनही वर्गांमध्ये एक वर्ग आहे तो म्हणजे “मध्यमवर्ग” ! मग अशा परिस्थितीत या वर्गाचे काय?

सध्या घरातील रेशन तर संपलच आहे पण पगार सुद्धा पुरेनासा झालाय.. आतापर्यंत कसेबसे भागले पण आता पुढचा महिन्यात अथवा पुढील काही महिने पगार नाही झाला तर? आपल्या कुटुंबाचे काय, असा प्रश्न या मध्यमवर्गीयांना पडला आहे. घरभाडे थकले, लाईटबील आलेय, कर्जाचे हफ्ते थकलेय, भाजीपाल्याला तर पाचपन्नास लागतातच ! खिशात हात घातला तर २ रुपये हाताशी लागत नाही. स्वतःचे घर असेल तर ठीक, एक वेळ घरात उपाशी तरी बसू पण घर भाड्याचे.. घरमालक दररोज भाडे मागतोय आता तर पाणीपण घशा खाली उतरत नाही. तेव्हा उद्याचा उजाडलेला दिवस मावळायचा कसा ह्या चिंतेने डोळ्याला डोळा लागत नाही, अशी अवस्था ह्या मध्यमवर्गीय माणसाची झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

महानगरातल्या झोपडपट्ट्यापासून तर आदिवासी पाड्यापर्यंत, घरकाम करणाऱ्या बायकांपासून ते घर बांधणाऱ्या कामगारांपर्यंत, घराघरातल्या बेरोजगारापासून ते गावाबाहेरच्या भटक्यापर्यंत… शेतकरी, प्रायव्हेट कामगार, रिक्षा, टॅक्सी, बस चालकापासून ते चतुर्थश्रेणी कामगार, लहान-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक ज्यांनी सकाळी दुकानच उघडले नाहीतर सायंकाळी हातावर काय येणार ? त्यांचा व्यवसायच त्यांचा पोटाची खळगी भरणारे साधन. अशा सगळ्या उभ्या आडव्या भारतात अस्वथता, अनिश्च्तता आणि निराशेची लाट पसरलीय. ह्या लाटेला योग्य दिशा केव्हा मिळणार ? या मध्यम वर्गातील माणसाची देशभक्ती अतिशय प्रामाणिक आहे.. सरकार-शासनाने दिलेले सर्व नियम पाळणार आणि कोणी त्याचे उल्लंघन केले तर तिथेच त्याचा जाबही विचारणार…

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

देशाला बळ देणाऱ्या टाळी थाळी सारख्या प्रत्येक आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देतात, पण आता टाळी थाळी नाद करणारे हेच मध्यम वर्गीय हात आता कोणापुढे कसे पसरायचे म्हणून संकोचित झाले. तेव्हा या हातांना स्वाभिमानाचे बळ मिळणार तरी कसे? हा न सुटणारा प्रश्न प्रत्येक मध्यमवर्गीयाचा मनातला आहे. देशहितासाठी जरी हे नियमांचे साज सोहळे योग्य असले तरी लोकांचे प्राण वाचवायचे आहेत ! ”जान है तो जहान है” हे सर्व खरे असले तरीही, ही सर्व सावरासावर करताना सामान्यांना ‘कोरोना’ मुळे नाहीतर तर भुकेनेच प्राण गमवायला लागतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here