नाशिक: विक्रीसाठी अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण; संशयिताला अटक
नाशिक (प्रतिनिधी): आठवडाभरापूर्वी ग्रामीण भागातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणारी टोळी जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच, गोदाघाटावरून अवघ्या १० महिन्याच्या चिमुरडीचे व्रिकी करण्यासाठी अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने सातपूरमधून संशयित युवकाला अटक केली आहे.
त्याच्याकडून अपहृत मुलीची सुटका करण्यात आली आहे.
पाठोपाठच्या या घटनांमुळे लहान मुले व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता धोक्यात आली असून, पालकांमध्ये यामुळे भितीचे वातावरण आहे.
सोनी युवराज पवार (रा. गौरी पटांगण) यांची अवघ्या १० महिन्यांची गायत्री ही गेल्या सोमवारी (ता.८) दहिपुलानजिकच्या म्हसोबा पटांगणावर खेळत होती. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयिताने गायत्री हिचे अपहरण केले.
सोनी यांनी आसपास शोध घेऊनही गायत्री सापडली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या सोनी पवार यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखांना गायत्रीच्या अपहरणाची माहिती देण्यात आली.
मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने गायत्रीची माहिती घेत शहरभरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठा, गर्दीची-वर्दळीची ठिकाणी शोध घेतला. दरम्यान, उपनगरीय परिसरातही पोलिसांनी शोध सुरू केला असता, खबऱ्याकडून पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली.
त्यानुसार, मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सातपूर कॉलनी परिसरातून संशयित मकरंद भास्कर पाटील (रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपूर कॉलनी, सातपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून अपहृत गायत्रीही पोलिसांना मिळून आली. संशयित पाटील याने गायत्रीची विक्री करण्यासाठी अपहरण केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमुरडी गायत्रीचे अपहरण केल्यानंतर मध्यवर्ती गुन्हेशाखेने अवघ्या २४ तासात गुन्ह्याचा छडा लावत तिची सुटका केली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, मध्यवर्ती गुन्हेशाखेचे डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील माळी, हवालदार श्रीराम सपकाळ, संजय गामणे, संदीप पवार, आनंदा काळे यांच्या पथकाने बजावली.
मुंबईला करणार होता विक्री:
संशयित मकरंद पाटील हा बेरोजगार असून, रेल्वेप्रवासात मुंबईतील एकाने त्याला लहान मुलीच्या बदल्यात वाटेल तेवढे पैसे देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार पाटील याने गोदाघाटावर पाळत ठेवून गायत्रीचे सोमवारी (ता.८) सायंकाळी अपहरण करून सातपूर कॉलनीतील घरी घेऊन आला.
त्याच्या घरात कोणीही नसताना त्याने चिमुरडी आणल्याने आसपासच्या लोकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच गायत्री आजारी असल्याने त्याने रात्री परिसरातील एका दवाखान्यातही तिला नेले होते. सदरची बाब पोलिसांन मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले आणि संशयित पाटीलला अटक करून गायत्रीला ताब्यात घेतले. संशयित पाटील याच्यावर मारहाणीचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. दरम्यान, संशयिताने यापूर्वीही मुलींचे अपहरण केले असावे का, त्यादृष्टिने तपास करीत आहे.