वाद्यवृदांच्या तालावर छात्रांचे शानदार पथसंचलनः आकर्षक सजावटीबरोबरच अश्वांचाही सहभाग
नाशिक (प्रतिनिधी): सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित भोंसला मिलिटरी स्कूल, भोसला मिलीटरी कॉलेज आणि गर्ल्स स्कूलतर्फे कारगिल विजयदिना निमित्त युद्धात शहिद झालेल्या शूरवीर जवानांना मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने शहर परिसरात वाद्यवृंदाच्या साथीने काढण्यात आलेल्या रॅली,पथसंचलनाने सर्वांचेच लक्ष वेधले, आकर्षक सजावट व अश्वांचा सहभागही उल्लेखनीय ठरला.
संस्थेचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे यांच्या हस्ते नाशिक शहरातील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. संस्थेच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणापासून पथसंचलनास सुरुवात केली. विविध मार्गावरील पथसंचलन करणाऱ्या तुकड्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी ध्वज दाखवून मानवंदना दिली.
प्रमोद महाजन उद्यान या ठिकाणी उपाध्यक्ष अँड.अविनाश भिडे, सहकार्यवाह नितीन गर्गे, माजी सैनिकी वसतिगृह या ठिकाणी नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅ. श्रीपाद नरवणे, कुलकर्णी सिग्नल खजिनदार.शीतल देशपांडे यांनी शहीदांना मानवंदना दिली.
शहीद स्मारकांच्या ठिकाणी सजावट,पथसंचलन:
गंगापूर रोड येथे संस्थेचे पदाधिकारी व खेलो इंडियाचे अध्यक्ष प्रशांत नाईक,सीबीएससीचे चेअरमन आनंद देशपांडे,गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.शेख यांच्याहस्ते पुष्पगुच्छ वाहून मानवंदना देण्यात आली. या स्मारकांच्या ठिकाणी भोसला मिलीटरी कॉलेजने आकर्षक फुलांच्या सजावटीसह सर्व व्यवस्था केली होती. या पथसंचलनातही भोसला कॉलेजच्या सर्व छात्रांनी भाग घेतला, कॅटो कर्नल राम नायर,प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी आदी उपस्थित होते. महत्मा नगर येथे अँड सुहास जपे यांनी मानवंदना देण्यात आली.
सोळाशे विद्यार्थ्यांचा समावेश:
शहर व परिसरातील वेगवेगळ्या मार्गांनी 1600 विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. यामध्ये भोंसला मिलिटरी स्कूल मुले, मुली, तसेच विद्यप्रबोधिनी , भोंसला मिलिटरी कॉलेज तसेच शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील एन.सी.सी. चे विद्यार्थी सहभागी झाले. सर्व विद्यार्थी पथसंचलन करीत भोंसला स्कूलच्या आवारात शहीद स्मारकास मानवंदना देण्यासाठी एकत्रित झाले.
स्कूल आवारातही अनोखा उत्साह:
स्कूलच्या आवारातील शहीद स्मारकास मानवंदना देण्यासाठी कर्नल रजनिश माही हे प्रमुख पाहुणे होते. या ठिकाणी कर्नाल माही,कॅप्टन नरवणे आदीच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.. आपल्या भाषणात माही म्हणाले, आजचा दिवस हा भारतीयांना अभिमानास्पद आहे. 23 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 26 जुलै रोजी भारताच्या शूर जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावले होते.या विशेष प्रसंगी वीरगती प्राप्त केलेल्या शूर पुत्रांचे स्मरण करून दरवर्षी 26 जुलै रोजी ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. यावेळी कॅप्टन नरावणे यांनी मनोगत व्यक्त केले. ब्रिगेडियर मंगलमुर्ती मसूर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथींचा सत्कार संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देवून करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रकाश पाठक, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदरकर, आशुतोष रहाळकर आदी उपस्थित होते. शौमिक मगंती या रामदंडीने सुत्रसंचालन केले. प्राचार्य राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.