देशातली पहिली किसान रेल्वे आजपासून नाशिकमधून धावणार….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्हा हा कृषी साठी अत्यंत महत्वाचा जिल्हा असून देशातील पहिली रेल्वे नाशिक मधून सुरू होत आहे. नाशिकची ही निवड सार्थ निवड असून किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. ही रेल्वे दर शुक्रवारी नाशिकहून निघून दुसऱ्या दिवशी दानापूर येथे पोहोचेल.

केंद्र सरकारच्या वतीने आज देवळाली ते दानापूर येथे सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या किसान रेल्वेचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात अधिक प्रगत असलेल्या नाशिक मधून आज पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकची निवड ही अत्यंत योग्य निवड आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की आज किसान रेल्वे चे उद्घाटन होत आहे. जिल्ह्यात कांदा पिकाचे उत्पादन अधिक होते, भाव बऱ्याच वेळा भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरतात. तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या देखील करतात. अशा वेळी या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना तोडगा मिळून शेतकरी आत्महत्या कमी होतील यात शंका नाही.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा असते या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केलेला हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाचा फायदा नाशिक जिल्ह्याला अधिक होईल. भारत भरात अनेक किसान रेल्वे सुरू व्हाव्यात. या माध्यमातून देशातील विविध भाग जोडले जातील आणि शेतमालाचा पुरवठा होईल. तसेच देशातील विविध भागातील कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यावेळी पालकमंत्री भुजबळ फार्म येथून सहभागी होताना बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर,  रेल्वे मंत्री पियुष गोयल,  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,  रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे,  खासदार डॉ.भारती पवार,  खासदार डॉ. नरेंद्र जाधव,  आमदार सरोज आहिरे आदी उपस्थित होते.